गुरुवार, १४ जुलै, २०११

वनवासी पांडुरंग

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा !!
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिका भेटी परब्रम्ह आलेगा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा !



अखंड हिंदुस्थानाच्या उद्धारासाठी पुंडलिका भेटीसाठी आलेले परब्र : म्ह शेकडो वर्षे पंढरपूरच्या पवित्र नगरीत कटेवर हात ठेवून भक्ताचा उद्धार करत आहे . इतका भक्तीचा आणि भक्ताचा महापूर पंढरपूरशिवाय इतर कोणत्या नगरीत होत असेल , असे वाटत नाही . पण या दु : खाच्या भवसागरातून सगळ्यांना सोडवणारा पांडुरंगाचा सासुरवास कधी संपणार आहे , या बाबतीत पराब्राम्हाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच आहे .
पांडुरंगभेटीची आर्तता लागली म्हणून पंढरपूरला जायचं ठरवलं . रात्रभर प्रवास करून पहाटे पंढरपूरच्या पवित्रनगरीत पोचलो . समस्त विश्वाच्या उद्धारासाठी निर्मळ वाहणाऱ्या चंद्रभागेत आमची पापे विसर्जित केली , ते पवित्र उदक मस्तकी घेताच क्षणार्धात पाप नाश झाले पण एक वेगळीच विषण्णता मनामध्ये दाटून आली . सगळ्यांना पवित्र करणाऱ्या चंद्रभागेच्या उदरातून कुठेतरी करुणामय स्वर ऐकू येत होता . अमावस्येच्या छायेत चंद्र असल्याने त्याचा प्रकाश फार क्षीण होता . अंधाराच्या उदरामधून मार्ग काढत चंद्रभागेचा प्रवास सुरू होता . नदीच्या किनाऱ्यावर प्रकाश यावा म्हणून कोणत्याही दिव्यांची वगैरे उपयोजना केलेली नव्हती . आलेल्या यात्रेकरूंना आपल्याच गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशाचा आधार घ्यावा लागत होता . नदीकाठीच बऱ्याच लोकांनी प्रातर्विधी उरकल्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती . त्यातून मार्ग काढत आम्ही भक्त पुंडलिकाच्या मंदिरापर्यंत पोहचलो . पहाटेचे चार वाजले होते . तिथे पंचवीस एक लोकांची रांग होती . पण ती लवकर पुढे का सरकत नाही या माझ्या संभ्रमावस्थेचे उत्तर आत गेल्यावर मिळाले . पुंडलिकाविषयी जराही भक्ती आणि आस्था असण्याची शक्यता नसणारी दोन माणसे पुजाऱ्याच्या वेशात आत उभी होती आणि येणाऱ्या प्रत्येकाकडून पैसे मागत होते . आमच्यापैकी एकाचा हात धरून त्याची आणि भक्त पुंडलिकाची इच्छा नसताना त्याच्याकडून संकल्प सोडून घेतला . आईचे नाव काय , वडिलांचे नाव काय असे काहीतरी प्रश्न विचारून १५१ रुपये टाका असा सज्जड दमही भरला . काही कळण्याच्या आतच मागून येणारे लोक ओरडायला लागले . माझ्या सहकाऱ्यांनी इच्छा नसताना १५१ रुपये त्या पुजाऱ्याच्या पोटी वाहून तिथून काढता पाय घेतला . त्यातले किती पैसे भक्त पुंडलिकाच्या मंदिराला वापरण्यात येतील हा प्रश्न मनात कायम ठेवून .
थोडेच अंतर चालून आम्ही पांडुरंगाच्या दर्शनासाठीच्या मुख्य रांगेपर्यंत पोहोचलो . फुले विकणाऱ्या पोरांनी गराडा घातला . ' आमच्याकडून घ्या , आमच्याकडून घ्या ' चा गजर चालू झाला . त्यातल्या दोघां - तिघांकडून फुलांच्या माळा घेतल्या आणि त्यांच्या म्हणण्यानुसार पादत्राणे त्यांच्या हवाली करून रांगेच्या इमारतीकडे जाऊ लागलो . तेवढ्यात सुरक्षिततेचा प्रश्न म्हणून एका पोलिसाने आमची तपासणी सुरू केली . बाकी काही न शोधता तो फक्त सगळ्यांचे मोबाइल तपासत होता . मला मोबाइल आहे का , असे त्याने विचारले आणि मी हो म्हणताच तो ठरल्याप्रमाणे अंगावर खेकसला . एवढंही कळत नाही का , जा निघा बाहेर . मोबाईल ठेवून या तिकडे . भक्ताचा उद्धार करणाऱ्या पराब्रम्हाच्या पहिल्याच पायरीवरची ही उद्धट खाकीगिरी मनाला त्रास देऊन गेली . समोरच मोबाइल ठेवण्याचे एक दुकान होते . प्रत्येक मोबाइलचे दहा रुपये याप्रमाणे आम्ही पाच मोबाइल ठेवले आणि दर्शनाच्या रांगेत येऊन पांडुरंग भेटीची आर्ततेने वाट पाहू लागलो . आतापर्यंत सकाळचे सहा वाजले होते . पांडुरंगाच्या नगरीत भक्ताचा महासागर पसरला होता . भक्त प्रवासाचा , गैरसोईचा कुठलाही अविर्भाव चेहऱ्यावर न आणता पांडुरंग नाम घेण्यात तल्लीन झाले होते . ' बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल , ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय ' या गजराच्या अखंड माळा जणू विणल्या जात होत्या . ' पाउले हळू हळू चाला , मुखाने पांडुरंग बोला ' असा आमचा प्रवास दर्शनाच्या रांगेसाठी तयार केलेल्या इमारतीमधून सुरू होता . खरंतर त्या दिवशी एकादशी होती म्हणजे वैष्णवांसाठी पर्वणी होती , पण मंदिर समिती हे साफ विसरल्याचे जाणवत होते . त्या रांगेसाठीच्या संपूर्ण इमारतीत कचरा साठलेला होता . ते झाडण्याचे कष्ट कोणीही घेतलेले नव्हते . सगळीकडे लोकांनी थुंकून ठेवलेल्या भिंती धुतल्या जाण्याची वाट पाहात थकून गेल्या होत्या . स्वच्छतागृहामध्ये गेल्यावर आपणच अस्वच्छ होऊ या भीतीने तिकडे कोणीच फिरकत नव्हते . रांगेच्या इमारतीच्या नशिबी बांधल्यानंतर आजतागायत रंग आलेला दिसत नव्हता आणि होता तो रंग बेशरम प्रशासनामुळे कधीच चैतन्य हरवून बसला होता . खरंतर आत्मचैतन्याचा भान देणाऱ्या या पांडुरंगाच्या नशिबीही चैतन्य गमावलेली माणसं का आली , हा प्रश्न मनाला सहज स्पर्श करून गेला . रांग बरीच मोठी होती . दर्शनासाठी निदान ४ - ५ तास लागणार होते . पण कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती . मध्येच कुठे तरी मोरीसारखी चौकडी आणि कुठेतरी सार्वजनिक नळ असावा असा एक बेवारस नळ . ज्याकडे बघून तहान काय , पण जगायची इच्छाही उडून जावी , अशी अवस्था होती . भक्तांना शुद्ध , गार पाणी पाजण्याची इच्छा आणि कुवत मंदिर समितीमध्ये आणि इतर संस्थांनामध्ये कोट्यावधी रुपयांचे गुप्त दान करणाऱ्या कोणतच का नाही , याचे उत्तर मिळाले नाही . चार तासांचा रांगेतला प्रवास संपून मुख्य मंदिरात जाण्याच्या गॅलरीतून जात असताना तिथे मंदिर समितीचे लोक टेबले मांडून खुशाल पावत्या मागत बसले होते . आमच्यातल्या एकाने त्यांना प्रश्न केला , का हो या पैशाच करता काय आज एकादशी आहे . इथे साधे झाडलेलेही नाहीए . आता यावर तो पगारी माणूस काय बोलणार ? दोन मिनिटे शांत बसून नंतर त्यालाच या गोष्टीची लाज वाटली असावी , म्हणून तो तिथून ते पावती पुस्तक घेऊन अदृश्य झाला . अजून इथेही लाज वाटणारी माणसं आणि प्रवृत्ती शिल्लक आहे हा विचार उगीच मनाला आधार देऊन गेला . पुन्हा मंदिराच्या दिशेनं वाटचाल सुरू केली . मुख्य गाभाऱ्यात पोहचलो . पांडुरंगाचे दर्शन लांबूनच घडता संपूर्ण शरीरातून जणू विजेचं चैतन्य जाणवू लागलं आणि त्या पवित्र भूमीवर समर्पित होण्याच्या आर्ततेने नकळतपणे डोळ्यातून दोन थेंब प्रवासी झाले . पुढची पावले कशी पडली आठवत नाही . नजर त्या श्रीचरणी तल्लीन झाली होती . पण या पवित्र नात्यामध्ये क्षणार्धातच पुन्हा विघ्न आलं . मंदिरातले पुजारी आणि सुरक्षारक्षक बेशिस्तपणे भक्तांना लोटत होते . पांडुरंगाचं नशीब की तो थोडा लांब उभा होता नाहीतर यांनी त्यालाही लोटायला कमी केलं नसतं . तेथील पुजाऱ्यांना भक्तीभाव , भक्त , आणि पांडुरंग यांच्याशी काहीच घेणं नव्हतं . त्यांचा लक्ष होता फक्त गरम खिशांकडे . येणाऱ्या प्रत्येकाला दक्षिणा टाका असं ते मोठ्या अधिकारवाणीने सांगत होते . त्यांनी मलाही पकडले आणि १०१ दक्षिणा टाका असं फर्मान सोडलं . मी दक्षिणापेटीत टाकली आहे , असे उत्तर दिल्यानंतर त्यांचा संताप अनावर झाला . क्षणात चेहरा बदलला आणि मला धक्का मारत चला , व्हा पुढे म्हणत त्याने मनातल्या मनात एक शिवीशी मला हासडली . तिकडे भक्तांच्या उद्धारासाठी अठ्ठावीस युगे विटेवर उभे राहण्याचा शब्द दिल्याने पराब्राम्हाला तिथे थांबणं अनिवार्य होतं . भक्तांच्या माथ्याच्या स्पर्शाने त्याचे चरणकमल कमालीचे झिजले होते , पण तरीही भक्तउद्धाराचा हट्ट तो सोडायला तयार नव्हता . त्यांच्या एका स्पर्शाने आयुष्य उद्धरून जाते . ' ब्रम्ह सत्या जगन मिथ्या ' या उक्तीचा अर्थ कळू लागतो . त्याला बघितला की मग संपूर्ण आयुष्य मंगलमय होऊन जाते . कसलीही आस्था राहत नाही . अशा ह्या विश्वाकार्त्याच्या सतत सान्निध्यात राहूनही आपले आयुष्य पवित्र करून न घेऊ शकलेल्या त्या पैसे मागणाऱ्या पुजाऱ्यांचा मला राग येण्यापेक्षा कीवच आली .
रुक्मिणीच्या दर्शनासाठीही हीच अवस्था . तिथल्या पुजाऱ्याने आमच्यापैकी एकाला प्रसाद म्हणून नारळ दिले . पुढे आल्यावर दाराजवळ दुसरा द्वारपाल उभा होता . त्याने लगेच १०० रुपये मागितले . आम्ही कसले असे विचारण्याआधीच त्याने अतिशय उद्धट भाषेत नारळ काय फुकट नेणार काय असे उत्तर देत आमच्या हातातून नारळ हिसकावून घेतले आणि १०० रुपयांची वाट पाहणाऱ्या इतर नारळामध्ये त्या प्रसादरूपी नारळाला फेकून दिले . अर्थात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनानंतर खूप काही मिळालं होतं आणि हो तेवढे कटू अनुभवही . मंदिराबाहेर पडताच प्रसादासाठी लाडू घेण्यासाठी मंदिर समितीच्या दुकानात गेलो . तिथे ४० रुपयांचे लाडू घेऊनही तो महाभाग सुट्टे देण्यास तयार नव्हता . वास्तविक पाहत समोर पैशाचा ढीग लागलेला होता . मी वैतागलो . मगापासून झालेल्या घुसमटीचा सगळा राग त्याच्यावर काढला . मी कोणीतरी साहेब आहे असं समजून तो घाबरला आणि त्याने पटकन सुट्टे पैसे काढले . माझ्यामुळे इतरांनाही त्याने सुट्ट्यासाठी त्रास देणं तेवढ्यापुरता का होईना बंद केलं . प्रसाद घेऊन बाहेर पडलो . पहिले मोबाईल ताब्यात घेतले . ते घेताना तो पोलीस आणि हो दुकानदार यांच ' एकमेकां साह्य करू ' चालले आहे हे माझ्या लक्षात आलं . नंतर पादत्राणांचा शोध सुरू झाला . तो फुले विकणारा तिथे काही दिसायला तयार नव्हता . तेवढ्यात तो कुठून तरी आला आणि म्हणाला , साहेब तुमच्या चपला इकडे ठेवल्या आहेत . माझा माल विकून तर कधीच संपला . पण तुमच्या चपला सोडून कसा जाणार म्हणून थांबलो ... पंढरपूरात पांडुरंग कुणाला तरी कळला आहे एवढे पाहून मन प्रसन्न झाले .
पुढे गाडीकडे जाण्यास निघालो . आता चांगले सकाळचे १० वाजले होते . पण मनातला अंधार अजून दूर होण्यास तयार नव्हता . पोटात चांगलेच कावळे ओरडायला लागले होते म्हणून तेथून पटकन गाडी बाहेर काढली आणि गाडीच्या चाकाबरोबर विचारांनीही गती घेतली की हे असं का ?
सगळा देश प्रगती करतोय , देशातून - परदेशातून पैशाचा ओघ वाहतोय . दर आषाढीला आणि कार्तिकीला लाखो भक्त याच नगरीत येतात . राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पांडुरंगावर एक दिवसापुरता का होईना महापुजेचा अधिकार गाजवून जातात . मग ही अशी अवस्था का ? त्या पांडुरंगाच्या राज्यात त्या पांडुरंगालाच वनवास का ? पांडुरंगाला पहिल्यापासूनच गरिबांचा देव म्हणून संबोधलं आहे . पैशाने मोठा बालाजी आणि भक्ताने मोठा पंढरपूरचा विठोबा पंढरपूरला येणार . सगळेच सामान्य जन असतात . त्यांची फार काही अपेक्षा मुळीच नाही पण ही हेळसांड थांबली पाहिजे . मंदिर परिसरात होणारी दादागिरी मंदिर समितीचे मंदिराच्या दानपेटी व्यतिरिक्त सर्वत्र असणारे दुर्लक्ष किळसवाणे आहे . बाकी ठिकाणी विकासासाठी होणारा करोडो रुपयांचा खर्च पंढरपूरात का होऊ शकत नाही . सरकार मधल्या लोकांना ती आपली जबाबदारीच वाटत नाही का ? खरंतर तिथे खूप काही करण्यासारखं आहे पण कोणीही पुढाकार घेत नाही , मंदिराच्या आसपास जेवणाची उत्तम सोय नाही , मोबाईल , चप्पल ठेवण्यासाठी ठिकठिकाणी मंदिर समितीची सोय नाही , स्वच्छतेच्या नावाने सगळीकडेच बोंब आहे पण यावर कुणीच आवाज उठवताना दिसत नाही . वारकरी संप्रदायातले कितीतरी महाराज या परिसरात आपले स्थान मांडून आहेत पण तेही याकरता कुठे आवाज उठवताना दिसत नाहीत .
मी पंढरपूरला जाणारा नियमित वारकरी नाही . वर्ष - दोन वर्षातून एकदा जाणे होते . हे नेहमीच जाणवत होते . पण आज ते पुन्हा सगळ्यांसमोर मांडावेसे वाटले . बरीच संस्थाने फिरलो पण अशी अवस्था कुठेच नाही . शेगाव संस्थानाने तर सोयी कशा असाव्यात याचा आदर्शच घालून दिला आहे . मग हे पंढरपूरात का होऊ शकत नाही ? पंढरपूर मला कमर्शियल व्हावं असं मुळीच नाही . पण सोयीसुविधांमध्ये सुधारणा होणे चूक आहे का ? माझे मनोगत म्हणून याची एक कॉपी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , गृहमंत्री यांना नक्कीच पाठवणार आहे , त्यामुळे त्यांना काय फरक पडेल माहित नाही . त्यांच्या प्रचंड फाईलच्या ढीगामध्ये पांडुरंगाचा आवाजही दडपला जाईल . असो पांडुरंगाचे खरे भक्त म्हणून त्याला सासुरवासातून सोडवण्यासाठी मी हा प्रयत्न करणार आहे काय सांगावं असाच कुणाच्या तरी प्रयत्नातून सासुरवास करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदे करणाऱ्या ह्या निद्रिस्त सरकारला जाग येईल आणि जगात कल्याणासाठी २८ युगे उभा ठाकलेला हा पांडुरंग काही युगे तरी सासूरवासातून सुटू शकेल , अशी आशा बाळगायला काय हरकत आहे ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा